Thursday, 13 February 2014

मधुचंद्राचे मंतरलेले दिवस

मधुचंद्राचे मंतरलेले दिवस

फेब्रुवारी महिना उजाडला आणि सगळीकडे प्रेमाचे वारे वाहू लागलेत. गुलाबी थंडीत रस्त्यांच्या कडेला असणा-या दुकानांपासून ते मेल बॉक्समध्ये येणा-या हजारो ऑफर्सच्या ई-मेल्सपर्यंत संपूर्ण माहोल लाल-गुलाबी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हनिमून अर्थातच मधुचंद्र या फारशा लिहिल्या-बोलल्या न जाणा-या विषयावर थोडं लिहायचा प्रयत्न करतेय. माझ्या मधुचंद्राच्या काही मधुर आठवणी तुमच्यासोबत इथं शेअर करतेय.

हनिमून म्हणजेच मधुचंद्र ही संकल्पना ज्याने कुणी निर्माण केली असेल तो खरंच ग्रेट असला पाहिजे. आपण अजूनही या विषयावर हळूहळू कानगोष्टीच करतो, पण खरं तर या सुंदर अनुभवाबद्दल बोललंच पाहिजे. ‘आमच्या वेळी नव्हतं हो असलं काही’ असं म्हणणारी पिढी आता जवळजवळ संपुष्टात आली आहे आणि आपली पिढी या शब्दाला चांगलीच सरावली आहे. थोडक्यात ‘हनिमून पिरीयड’ म्हणजे आपल्या भाषेत नव्याचे नऊ दिवस!
असो, असं म्हणतात की, कुठल्याही व्यक्तीची खरी ओळख प्रवासादरम्यानच होते. म्हणूनच शाळेतल्या किंवा कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींची मैत्री सहलीनंतर अधिक घट्ट होते. वर्षातून एकदा तरी एकत्र सहलीला जाणा-या कुटुंबांमध्येही हे पाहायला मिळतं. म्हणूनच दोन अनोळखी व्यक्तींची एकमेकांशी खरी ओळख होण्यासाठी प्रवासाहून अधिक योग्य काही असूच शकत नाही.आपण ‘मधुचंद्र’ ही संकल्पना खूपच साचेबद्ध करून टाकली आहे. नवीन नवरा-नवरीने ख-या अर्थी वैवाहिक आयुष्याची सुरुवात करण्यासाठीची सहल एवढाच अर्थ यातून अनेकांना अभिप्रेत असतो. हा अर्थ कितीही योग्य असला तरी तो तेवढाच नाहीए एवढं नक्की! खरं तर एकमेकांचा सहवास हा मधुचंद्राच्या संपूर्ण प्रथेतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. एकदा दैनंदिन जीवनाला सुरुवात झाल्यानंतर एकमेकांसाठी असा खास राखीव वेळ फार कमी वाटय़ाला येतो. त्यामुळे लग्नानंतरचे हे काही दिवस फक्त आणि फक्त एकमेकांसोबत घालवणं अत्यावश्यक आहे.
हनिमूनचा सरसकट अर्थ नवदाम्पत्याने एकमेकांसोबत पहिल्यांदा प्रवासाला जाणं एवढाच असला तरी त्यात अनेक छोटय़ा-मोठय़ा मजेदार गोष्टीही दडलेल्या आहेत. कदाचित म्हणूनच या विषयावर सिनेमे बनवण्याची कल्पनाही काही निर्मात्यांना सुचली असावी. पण सिनेमा आणि वास्तव यात खूप फरक असतो. म्हणजे हनिमूनला गेल्यानंतर डोंगर-द-यांमध्ये जाऊन गाणीबिणी गाणं असं वास्तवात काही होत नसतं. पण ही सहल ‘आइस ब्रेकर’चं काम मात्र नक्कीच करते. म्हणजेच नवीन जोडप्यात असलेला वागण्या-बोलण्यातला एक प्रकारचा संकोच या सहलीमुळे दूर होतो. शिवाय लग्नाच्या तयारीमुळे, विधींच्या गडबडीमुळे आणि पाहुण्यांच्या गजबजाटामुळे थकून गेलेल्या मनाला आणि शरीराला आलेला शीण घालवण्यासाठी ही सहल हवीच!आपल्याकडे ही संकल्पना अर्थात पाश्चिमात्य देशांकडून आली आणि कालौघात लग्नाशी निगडित आपल्या इतर अनेक प्रथा-पद्धतींपैकी एक होऊन आपलीशी झाली. म्हणूनच लग्न ठरल्यापासूनच ‘हनिमूनला कुठे जाणार’ अशी विचारणा नातेवाइकांपासून मित्र-मैत्रिणींपर्यंत सगळ्यांकडून सुरू होते. जणू काही लग्नाच्या बैठकीत सर्वात आधी हाच मुद्दा चर्चेला घेतलेला असतो. माझ्या निरीक्षणाप्रमाणे तर इतरांनाच वधू-वरांच्या या सहलीचं जास्त कुतूहल असतं. ते दोघं बिच्चारे तर या विषयावर एकमेकांशी बोललेलेही नसतात.
आधी हा विषय काढायलाच मुळात अवघडल्यासारखं वाटत असतं. सुरुवात कुणी करायची, असा प्रश्न पडलेला असतो. साखरपुडा झाल्यानंतर कसाबसा हा विषय निघतो. त्यानंतर जायचं कुठे, हा यक्षप्रश्न अनेक जोडप्यांना पडलेला दिसतो. सहसा नवरदेवच या संपूर्ण सहलीचं आयोजन करत असल्यामुळे नियोजित लग्नांमध्ये काही वेळा मुलीला फक्त कुठे जाणार आहोत हे सांगितलं जातं, विचारलं जात नाही. पण बरेचदा मुलगा-मुलगी या गोष्टी मिळूनच ठरवतात आणि त्यातच खरी गंमत आहे.आमचं लग्न ऐन सहलींच्या सिझनमध्ये, म्हणजे डिसेंबरमध्ये झाल्यामुळे ऑगस्टमध्ये साखरपुडा झाल्यानंतर काही दिवसांनी लगेच आम्ही हनिमूनसाठी स्थळसंशोधनाला लागलो. आम्हा दोघांनाही डोंगर-द-यांपेक्षा समुद्रकिनारे अधिक प्रिय असल्याने उत्तरेकडचा भारत आमच्या यादीतून आधीच बाद झाला होता. दक्षिणेतली अनेक बेटं आणि दक्षिण भारतातल्या अनेक सहलींच्या वेळापत्रकांची चाचपणी करूनही मनासारखं काहीच हाती लागत नव्हतं. असाच ऑक्टोबर महिना उजाडला. आता मात्र आम्हाला डिसेंबरमधलं बुकिंग मिळण्याची शक्यता खूपच कमी झाली होती. एवढय़ात एका मित्राने मागच्या वर्षी त्याच्या हनिमूनचं बुकिंग केलेल्या कंपनीची माहिती आम्हाला दिली. तरी अजून ठिकाण निश्चित व्हायचं होतंच.
मग आम्ही दोघांनी एकत्र बसून थोडी चर्चा केली आणि ३-४ दिवसांसाठी प्रचंड खर्च करून कुठेतरी लांब जाऊन दिवसभर स्पॉट्स बघत हिंडून आणखी दमण्यापेक्षा ओळखीच्याच पण दोघांच्याही आवडत्या ठिकाणी चांगलं आठवडाभरासाठी जाण्याच्या विचारावर एकमताने शिक्कामोर्तब झालं. कारण आम्हाला पर्यटनस्थळं बघत दिवसभर फिरत राहण्यापेक्षा एकमेकांसाठी अधिक वेळ हवा होता. मग अर्थात आमचं गोव्याला जाण्याचं नक्की झालं.अर्थात, इथे जाण्याआधीही अनेकांनी आमचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलाच पण आम्ही मात्र कुणाचं काहीही ऐकायचं नाही असं ठरवलंच होतं. मैत्री तर आमची आधीच झालेली होती. त्यामुळे ही सहल आम्ही भरपूर एंजॉय करणार होतो, यात शंकाच नव्हती.
गोवा आम्ही दोघांनीही आधी पाहिलेलं असलं तरी यावेळी ते आम्हाला नवीन भासत होतं. भारतीय पर्यटकांमध्ये फारसं प्रसिद्ध नसलेल्या ‘केंडोलीम’ नावाच्या गोव्यातल्या एका सुधारित गावात आम्ही राहिलो होतो. थिविम स्टेशनला उतरून या गावात जाण्यासाठी पुढे एक-दीड तासाचा प्रवास करावा लागतो. रिसॉर्टवाल्यांनी स्टेशनवरून आणण्यासाठी गाडी पाठवली होतीच. आम्हाला पाहिल्यावर तिथल्या मराठी स्थानिकांना मात्र खूप आनंद व्हायचा. आमच्या तिथल्या गाडीचा ड्रायव्हर व आम्ही रात्री जेवायला जायचो. तिथल्या वेटरसह अनेक मराठी भाषिक आमची आपुलकीने चौकशी करत, कारण इंग्रजी किंवा गोवन-कोकणी भाषा बोलणा-यांचं प्रमाण या भागात अधिक असल्याने मराठी बोलणारे पर्यटक तिथे आल्यावर त्यांना अप्रूप वाटतं. तिथे रशियन पर्यटकांचा सुळसुळाट इतका आहे की भारतीय पर्यटक अगदी क्वचितच नजरेस पडतात. इतकंच काय तर तिथल्या प्रत्येक रेस्टॉरंटच्या बाहेर दिवसाचा मेन्यू इंग्रजीसोबत रशियन भाषेतही लिहिलेला आहे. मग मेन्यूमध्ये रशियन पदार्थ नसतील तर नवलच! पण तिथल्या रशियन सुळसुळाटाचा एक फायदा मात्र असा की, त्यांच्या इथल्या वास्तव्यामुळे इथल्या हॉटेल्समध्ये उत्तम आणि तत्पर सोयी-सुविधांपासून वाइनपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी मिळतं. दोन मोठ्ठी चकाचक सुपरमार्केट, एका कॉलवर रिसॉर्टच्या दारात हजर होणारी गाडी अशा अनेक सुविधा या छोटय़ाशा गावातही उपलब्ध झाल्या आहेत. यासोबतच आम्हाला अत्यंत आवश्यक असलेली शांतता इथे लाभली कारण हे विदेशी पर्यटक मुळात शांतताप्रिय असतात. आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये राहत होतो तिथले अनेक अपार्टमेंट्स तर काही रशियन पर्यटकांनी विकतच घेतलेले आहेत. ते सुट्टीमध्ये इथे येऊन इथल्या सुंदर, शांत समुद्रकिना-यावर आपला वेळ मजेत घालवतात.
विशेषत: इथली संध्याकाळ अत्यंत सुंदर होती. रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेली, समुद्रकिना-यावर दूरवर पसरलेली अशी रेस्टॉरंटस दृष्टीस पडायची. दिवसा अगदी साधारण वाटणारी, बाहेरून मोकळी असलेली ही कौलारू रेस्टॉरंट्स आणि दुकानं संध्याकाळी मात्र नवीन आणि वेगळंच रूप परिधान करायची. दर संध्याकाळी प्रत्येक रेस्टोरंटमध्ये तिथले स्थानिक कलाकार इंग्रजी, रशियन तर कधी हिंदी गाणी सादर करत. तिथल्या मंद दिव्यांच्या आणि संगीताच्या साथीने मन धुंद होऊन जात होतं. दरम्यान, नाताळ जवळ आलेला असल्यामुळे संपूर्ण वातावरणात एक अनोखं चैतन्य भरलेलं होतं. इथल्या शांत, सुंदर वातावरणात आमचंही नातं फुलत होतं. दिवसागणिक एकमेकांच्या सवयी, आवडी लक्षात घेऊन, एकमेकांची काळजी घेत खरं तर आम्हीच एकमेकांसाठी सवयीचे होत होतो. हे दिवस खरंच मंतरल्यासारखे भासत होते.

अशाच एका निवांत संध्याकाळी आम्ही फिरून रिसॉर्टवर परतत होतो. गल्लीत वळलो आणि समोर काळ्या-निळ्या आसमंताच्या पार्श्वभूमीवर पूर्णाकृती चंद्र एका अनोख्याच तेजाने चकाकत असलेला दिसला किंवा मला तो तसा भासत होता. माझी नजर आणि मन त्याच्या दर्शनाने प्रचंड सुखावले होते. तो मनात खोल-खोल उतरत चालला होता आणि माझ्या हातात माझ्यावर अतोनात प्रेम करणा-या माझ्या जन्माच्या जोडीदाराचा हात होता. त्या संध्याकाळी, त्या ठिकाणी, मला ‘मधुचंद्र’ या शब्दाचा खरा अर्थ समजला होता.
तृप्ती एकबोटे-देवरूखकर

No comments:

Post a Comment