Thursday, 30 January 2014

थोडं तुझं, थोडं माझं!

थोडं तुझं, थोडं माझं!

कुठल्याही लग्नाच्या नंतरचा काही काळ मुलीसाठी आणि त्या घरातल्या माणसांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. जर या दिवसांमध्ये एकमेकांना समजून, सांभाळून घेतलं नाही तर पुढे त्याचे अप्रिय परिणाम होताना दिसतात. परक्या घरातून आलेली परकी मुलगी आपलीशी करण्यासाठी घरातल्यांनी आणि नवं घर आपलंसं करण्यासाठी मुलीने, अशा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणं आवश्यक असतं.


आपण आपल्याच तंद्रीत जगत असतो. घर, ऑफिस, मित्र-मैत्रिणी, शॉपिंग, सिनेमे, पिकनिक्स, पार्टीज असं सगळं नियमित सुरू असतं आणि एक दिवस ‘अचानक’ आपलं लग्न होतं. हो, लग्नाची तयारी कितीही दिवस सुरू असली तरी लग्न ‘अचानक’च झाल्यासारखंच वाटतं पण आपल्या आयुष्यात खूप मोठी उलाढाल झाली आहे हे लक्षात यायला मात्र थोडा वेळ लागतो. आपण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो तो आपल्या लग्नाचा दिवस येतो आणि निघूनही जातो पण खरी कसोटी सुरू होते त्यानंतर!
नव्या घरात जुळवून घेण्यासाठी कुणाला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. ते प्रत्येकाच्या स्वभावावरही अवलंबून आहे. लग्न ठरल्यानंतर काही दिवसांतच माझं मात्र इथल्या घरातल्या लोकांबरोबर चांगलंच ‘टयुनिंग’ झालं होतं. त्यामुळे मला इथे रुळायला तसा वेळ लागला नाही. पण फक्त घरातल्या माणसांसोबत सूर जुळून भागत नाही तर संपूर्ण राहणीमान जुळवून घ्यायचं असतं. भाजीच्या चवीपासून कपडय़ाच्या घडीपर्यंत सगळंच नवीन असतं. या नावीन्याचं अप्रूपही वाटत असतं आणि दडपणही येत असतं. माझं लग्न ठरल्यापासून मी आजूबाजूच्या लग्न झालेल्या स्त्रियांचं उगीच निरीक्षण करू लागले होते. त्या कशा वागतात, कसे कपडे घालतात, लग्नानंतरच्या अनुभवांबद्दल काय बोलतात वगरे पण त्यामुळे माझा संभ्रम अजून वाढत होता. कारण मला लग्न झाल्यानंतर आयुष्य आणखी सुंदर होतं, असं सांगणारं जवळजवळ कुणीच सापडलं नाही. प्रत्येक जण तक्रारींचा मोठा खजिनाच माझ्या समोर घेऊन येऊ लागला.
‘‘काही नाही गं, एकदा लग्न झालं की बाईचं स्वत:चं काही आयुष्य उरतंच नाही, येईल तुलासुद्धा अनुभव!’’ असं लग्नाला काही र्वष होऊन गेलेल्या माझ्या मैत्रिणींनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा तर मी पुरतीच हादरले. आपण लग्नाची घाई तर करत नाही ना, आपलं स्वत:साठीचं आयुष्यच संपून जाणार, अजून कितीतरी गोष्टी करायच्या बाकी आहेत, कुठून सुरुवात करू, लग्नाआधी काय काय करू अशा प्रश्नांनी मला भंडावून सोडलं होतं. माझी ही अवस्था पाहून माझ्या नव-याने मला विश्वास दिला की तुझ्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड मी कधीही येणार नाही. अनेकांना या फक्त बोलायच्या गोष्टी वाटतात पण गेल्या ६-७ महिन्यांत मी हे प्रत्यक्ष अनुभवलं आहे. खरं तर या बाबतीत सासरकडच्या लोकांना आणि नवीन सुनेला, दोघांनाही काही गोष्टींची जाणीव असणं फार गरजेचं आहे. मी लग्नाआधी जीन्स आणि टीशर्ट किंवा कुर्ती असे सुटसुटीत कपडे घालण्याला प्राधान्य देत होते पण लग्नानंतर माझी वेशभूषा थोडी तरी बदलणार यासाठी मी मनाची आधीच तयारी केली होती. लग्नानंतर काही दिवस साडय़ा, मग ड्रेसेस आणि आता ऑफिसमध्ये किंवा नव-यासोबत फिरायला जाताना मी सर्रास जीन्स वापरते. महत्त्वाचं म्हणजे त्यावर कुणी आक्षेप घेत नाही कारण मी देखील सवय नसताना साडय़ा आणि ड्रेसेस कटकट न करता घातले आणि आता मला त्याची सवयसुद्धा झाली आणि आवडूही लागलं आहे. याला तडजोड नाही म्हणता येणार तर हा दोन्ही बाजूंचा समजूतदारपणा आहे.
याबाबतीत अनेकदा मुलाला आणि सुनेला वेगवेगळे कायदे लागू झालेले मी पाहिले आहेत. म्हणजे मुलगा रात्री घरी कितीही वाजता आला तरी हरकत नाही पण सुनेला अर्धा तास उशीर झाला तरी त्याचा मोठा विषय अनेक ठिकाणी होतो. घरातली कामं करण्याबाबतही तसंच! माझा एक सहकारी तर पुरुषांनी घरातली कामं करण्याच्या पूर्ण विरोधात आहे आणि अशा मानसिकतेच्या अनेक व्यक्ती आपल्याला आसपास पाहायला मिळतात. खरं तर या गोष्टी आई-वडिलांनीच आपल्या मुलांना शिकवायच्या असतात. सहजीवन म्हणजे ‘तू कर, मी फक्त खातो’ असं होत नाही. माझ्या नव-याने लग्नाआधी जेव्हा मी घरातली सगळी कामं करतो असं मला सांगितलं तेव्हा खरं तर माझा अजिबात विश्वास बसला नव्हता पण आता मी हे खरंच अनुभवतेय. माझ्या घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याही कामात त्याचा मदतीचा हात कायम पुढे असतो आणि मला या गोष्टीचा अभिमानही वाटतो आणि माझा त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो. आता, ‘‘या गोष्टी लग्न नवीन आहे म्हणून काही दिवसांपुरत्याच आहेत’’ असं मला अनेकांकडून सांगितलं जातं पण निदान त्याची कामात मदत करण्याची तयारी आहे, एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.
गळ्यात मंगळसूत्र घातलं म्हणून काही एका दिवसात लगेच मुलीची बाई होत नाही. काल-परवापर्यंत आई-वडिलांच्या घरात बिनधोकपणे कुठल्याही जबाबदारीशिवाय बागडणारी मुलगी जेव्हा संपूर्ण अनोळखी घरात कायमची येते तेव्हा एका दिवसात तिला सगळं काही येण्याची, तिचा स्वभाव, सवयी, आवडी-निवडी बदलण्याची अपेक्षा करणं योग्य नाही. तिला थोडा वेळ द्यायला हवा. ती पुढाकार घेऊन एखादी गोष्ट करत असेल तर त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. मुळात घरी आलेली सून ही आपल्या कुटुंबाचा भाग आहे, हेच अनेक लोक मान्य करत नाहीत. अनेकदा तिने उत्साहाने केलेल्या गोष्टींना किंवा पदार्थाना ‘‘आमच्याकडे हे असं नाही करत’’ असं म्हणून तिचा हिरमोड केला जातो. तिच्याकडून अजाणतेपणी झालेल्या लहान-सहान चुकांचाही मोठा विषय केला जातो. मग कालांतराने तिचा घरात काही करण्याचा उत्साहच मावळतो आणि मग सून घरात काही करतच नाही असा शिक्कामोर्तबही तिच्यावर केला जातो. मी हे माझ्या जवळच्या अनेक कुटुंबांमध्ये होताना पाहिलं आहे.
अनेकदा मुलीही हीच चूक करतात. मग ‘आमच्याकडे’ असं आणि ‘तुमच्याकडे’ तसं या वादात ही कुटुंब कायम अडकून पडतात आणि कालांतराने नात्यांमधली दरी रुंदावत जाते. जेवण, सणवार, व्रत-वैकल्यांच्या बाबतीत माहेरच्या पद्धतींना चिकटून राहण्यापेक्षा नवीन घरातल्या नवीन पद्धती शिकून त्या पुढे चालू ठेवणं केव्हाही इष्टच! मी आणि माझ्या नव-याने सुरुवातीपासूनच काही गोष्ट जाणीवपूर्वक टाळल्या आणि काही सवयी मुद्दाम लावून घेतल्या. जसं, आम्हा दोघांपैकी कुणीही ‘माझे’ किंवा ‘तुझे’ असा नातेवाइकांबद्दल, घराबद्दल, वस्तूंबद्दल उल्लेख केला की आम्ही लगेच एकमेकांना टोकतो. जे काही आहे ते ‘आपलं’ आहे आणि माझ्या अनुभवानुसार याचा खरंच आपल्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या मानसिकतेवर खूप सकारात्मक परिणाम होतो. खरं तर, लग्न म्हणजे नवरा-नवरीसोबत घरातल्या प्रत्येकासाठीच आयुष्याच्या एका नवीन पर्वाची सुरुवात असते, आईची सासू होत असते, वडिलांचे सासरे होत असतात तर बहिणीची नणंद होत असते. नात्यांमध्ये होणारे हे सगळे बदल ठरवलं तर खूप सुखदायी होऊ शकतात. एकमेकांकडचं चांगलं ते घेऊन, या नवीन पर्वाची सुरुवात केली तर सगळ्यांसाठीच गोष्टी सुकर होतात.

मी स्वत:ला माझ्या सासरच्या घरात एकरूप करण्यासाठी काही गोष्टी प्रयत्नपूर्वक करते. तसेच प्रयत्न मला सामावून घेण्यासाठी इथली माणसंही करताना दिसतात. या घरात रुळण्यासाठी आवश्यक वेळ इथल्या लोकांनी मला दिला आहे आणि मला त्यांच्यात एकरूप करून घेण्यासाठी मीही त्यांना तितकाच वेळ देत आहे आणि मला खात्री आहे की पुढे हा वेळच आमच्यातली नाती भक्कम करणारा दुवा ठरणार आहे.

तृप्ती एकबोटे-देवरुखकर

नाव ठेवावे का?

नाव ठेवावे का?

आपण जन्माला येतो ते निव्वळ एक बाळ म्हणून, आपलं नाव आपल्याला ओळख मिळवून देतं. कुठल्याही मुलीच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक असलेलं, प्राणपणाने जपलेलं, कुणी प्रेमाने ठेवलेल्या टोपणनावाचं मूळ असलेलं नाव एका झटक्यात केवळ लग्न झालं म्हणून तिची मर्जीही न जाणून घेता बदलून टाकणं, अशा विचित्र प्रथा आपल्याकडच्या लग्नांमध्ये का असतात, याचं उत्तर कदाचित कुणाकडेही नसावं...

माझ्या या सदरातल्या पहिल्या म्हणजेच गेल्या गुरुवारच्या लेखाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम वाचकांचे खूप खूप आभार! माझा तो लेख वाचून माझी आई खूपच भावूक झाली होती. मी माझ्या नावात दोन्हीकडची आडनावं लावली या गोष्टीचं तिला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं. त्यावर मी तिला म्हटलं की, हे तर स्वाभाविकच आहे कारण जर तुम्ही मला लिहायला-वाचायला शिकवलंच नसतं तर मी कधी हा लेख लिहूच शकले नसते. तिला आणि बाबांना मात्र माझ्याकडून अगदी सहज घडलेल्या या कृतीचा खूप अभिमान वाटला. तिच्याशी झालेल्या त्या संभाषणानंतर एका गोष्टीची मला प्रकर्षाने जाणीव झाली,आपण कितीही म्हटलं की ‘नावात काय आहे’ तरी आपलं नाव हा आपल्या अस्तित्वाचा सर्वात मोठा घटक असतोच. आपल्याकडे लग्नातही नाव या विषयाशी निगडित अनेक गमतीजमती असतात. म्हणजे नाव घेणं, बायकोचं नाव बदलणं, नव-याला नावाने हाक मारणं ते अगदी ‘नावं ठेवणं’, सगळ्यातच नावाची भूमिका मोठी! नावात काय आहे हे खरं तर या वेळी उमगतं.
जेव्हा माझं नाव लग्नानंतर बदलण्याचा विषय समोर आला तेव्हा मी त्याला सपशेल नकार दिला होता. सुदैवाने त्यासाठी मला कुणाची मनधरणी करावी लागली नाही की जीवाचा आटापिटा करावा लागला नाही. माझ्या विचारांचा माझ्या नव-याने आणि सासरच्यांनी आदर केला आणि माझ्या आई-वडिलांनी माझ्या जन्मानंतर कौतुकाने सोहळा करून ठेवलेलं माझं नाव कायम राहिलं. एकदा माझ्या नव-याने मला ‘काय हरकत आहे नाव बदलायला’ असं गमतीने विचारलं. त्यावर मी त्याला इतकंच म्हटलं की ‘मुलीचं लग्नात नाव बदलण्यामागचं एक तर्कशुद्ध कारण तू मला दे आणि खुशाल माझं नाव बदल.’ त्यानंतर पुन्हा जेव्हा हा विषय निघाला तेव्हा मी त्याला विचारलं की ‘आता, तुझ्या वयाच्या २८व्या वर्षानंतर मी अचानक एक दिवस तुझं नाव बदललं तर तुला कसं वाटेल?’ मला आठवतं, त्या दिवसानंतर आमच्या बोलण्यात हा विषय कधीच आला नाही. एवढंच काय, तर लग्नाच्या वेळी जेव्हा ‘काय नाव ठेवणार रे!’ अशी त्याच्या नातवाईकांकडून विचारणा झाली तेव्हा तो परस्परच कशाला बदलायचं नाव, हे नाव चांगलंच आहे असं म्हणू लागला. याचाच अर्थ माझं म्हणणं त्याला पटवून देण्यात मी शंभर टक्के यशस्वी झाले होते.
लग्नात मुलीचं नाव बदलण्यामागचं तर्कशुद्ध कारण आपल्यापैकी कुणालाच माहीत नसावं. पूर्वापार एखादी पद्धत चालत आली आहे म्हणून एखादी गोष्ट करायची, याला खरं तर काहीच अर्थ नाही. ज्या नावाने मुलीच्या अस्तित्वाला पहिल्यांदा ओळख मिळाली ते नाव बदलणं म्हणजे तिचं लग्नाआधीचं अस्तित्वच नाकारण्यासारखं नाही का? कदाचित ही पद्धत सुरू होण्यामागचं कारणही हेच असेल. कारण आपल्या समाजव्यवस्थेत मुलीने नवीन आयुष्याची सुरुवात करताना सहसा तिच्या संपूर्ण भूतकाळाची लग्नाच्या होमकुंडात आहुती द्यायची अशी पद्धत आहे, त्यात नावही आलंच.
काही जणींना ही काही फार मोठी गोष्टच नाही, असं वाटतं, पण मैत्रिणींनो, आपला जन्म झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांनी किती कौतुकाने अनेक नावांचे अर्थ शोधत, काही नावांवरून एकमेकांशी वाद घालून मग कुठे एक नाव आपल्यासाठी ठरवलं असेल. अत्यंत प्रेमाने, धुमधडाक्यात बारसं करून आपल्याला हे नाव दिलं असेल. आपण आजवर कमावलेली सगळी प्रशस्तीपत्रकं, बक्षिसं एवढंच काय तर मोबाइल, इंटरनेटचं बिल आणि अगदी बँकेतलं खातंदेखील ज्या नावावर आहे, ते नाव अचानक कुणीतरी केवळ आपल्यावर स्वत:चा हक्क प्रस्थापित करण्यासाठी म्हणून बदलत असेल तर ते योग्य नाही. मुळात आपली ओळख परस्पर बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही.
आता हा लेख वाचणा-या अनेक काकूंना हे आगाऊपणाचं वाटत असेल खरं, पण निदान माझं नाव बदलण्याचा विषय झाला होता तेव्हा माझ्या डोक्यात हे सारे विचार आले होते. अगदी असंच प्रत्येकाला वाटावं हे काही गरजेचं नाही. कुणी सांगावं, काही जणींना कदाचित त्यांचं नाव आवडतही नसेल आणि निदान लग्नाच्या निमित्ताने ते बदलतंय म्हणून त्या खूशही होत असतील. आडनावाचंही थोडय़ाफार प्रमाणात तसंच आहे, पण आपण एका नवीन कुटुंबाचा भाग होत असताना त्यांची ओळख आत्मसात करण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला ती आपल्याकडून मिळण्यासाठी सासरकडचं आडनाव स्वीकारायलाच हवं. परंतु माझ्या मते, त्यासाठी माहेरच्या आडनावाचा त्याग करण्याची काहीच आवश्यकता नाही. लग्न म्हणजे आपल्याला विधी, कपडे, आमंत्रणं, दागिने, नवं घर असं सगळं वरवरचंच वाटत असतं, पण खरं तर लग्न या सगळ्याहून खूप वेगळा, असा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा, अनुभवांचा, नव्या-जुन्या विचारांचा आणि प्रथांचा एकत्रित सोहळा असतो.
मुलीला एकीकडे आईबाबांचं घर सोडून जायचं म्हणून वाईट वाटत असतं आणि दुसरीकडे नव्या घरात सासू-सासऱ्यांना, नव-याला हाक काय मारायची, इथपासून सगळे प्रश्न पडलेले असतात. मी तर सासू-सासऱ्यांना लग्न ठरल्यापासूनच आई-बाबा बनवलं आणि नव-यालाही सुरुवातीपासून नावाने हाक मारत होते त्यामुळे पुढे तेच कायम राहिलं. माझ्या सासरी खरं तर या गोष्टीवर कुणाचाही आक्षेप नाही पण माहेरी मावशी, आजी वगरे मला अनेकदा म्हणतात ‘अगं, नावाने काय हाक मारतेस, ‘अहो’ म्हणावं’ आणि त्यावर माझं उत्तर असतं की, तोसुद्धा मला ‘अगं’ऐवजी ‘अहो’, तृप्ती, ऐकलंत का? असं म्हणणार असेल तर मला ‘अहो’ म्हणायला काहीच हरकत नाही.’ माझ्या या उत्तरामुळे मी त्यांना अनेकदा अगोचर वगरे वाटते, पण चालायचंच! मला वाटतं, प्रश्न जर मान देण्याचाच असेल तर तो दोघांनीही एकमेकांना द्यायला हवा. नाहीतर समोर असताना ‘अहो’ म्हणायचं आणि इतर वेळी ऑफिसमध्ये, माहेरी, ट्रेनमधल्या मैत्रिणींसमोर ‘तो माझा नवरा’ असं म्हणायचं. त्यापेक्षा मी चारचौघांमध्ये बिनदिक्कत ‘माझा सागर’ असा प्रामाणिकपणे माझ्या नव-याचा उल्लेख करते. त्यात मानही आला आणि प्रेमही!


माझ्या निरीक्षणाप्रमाणे एकमेकांना नावाने हाक मारणा-या जोडप्यांच्या नात्यामध्ये एक वेगळीच सहजता आणि पारदर्शकता दिसते. याउलट नव-याला ‘अहो’ आणि बायकोला ‘अगं’ म्हणणा-या जोडप्यांमध्ये कायम एक असमानता राहते. आपल्याकडे बाईला ती पुरुषापेक्षा सर्वार्थाने कमी आहे, कायम त्याच्यावर अवलंबून आहे, असं बजावण्यासाठी म्हणूनच अशा पद्धती रूढ करण्यात आल्या असाव्यात, असं माझं ठाम मत आहे. आपल्या रूढी-परंपरांचा मीही प्रचंड आदर करते पण जे निर्थक आणि असमानता निर्माण करणारं आहे ते सोडून देणंच योग्य! नव-याबद्दलचा आदर ही दाखवण्याची नाही तर बाळगण्याची गोष्ट आहे. नवरा-बायकोचं नातं हक्काचं, मैत्रीचं आणि पारदर्शक असलं तर पुढची वाट सुकर होते. त्याची सुरुवात नावापासून होते असं म्हणायला हरकत नाही कारण कुठलंही स्थळ आलं की आपण आधी नाव विचारतो आणि म्हणूनच एकमेकांच्या नावांचा आदर करून एकमेकांना नावाने संबोधणं ही खरं तर एका सुंदर नात्याची सुरुवात होऊ शकते.

गोष्ट माझ्या लग्नाची

गोष्ट माझ्या लग्नाची

लग्न ठरणं, लग्न पार पडणं आणि लग्नानंतरचं नवं-कोरं आयुष्य हे एकाच गोष्टीचे तीन वेगवेगळे पदर आहेत. तिन्हीतली पात्र तीच फक्त परिस्थिती वेगवेगळी. या गोष्टीत कुटुंब, प्रेम, भावना, नाती असं सगळं काही अनुभवता येतं आणि तेही प्रत्यक्षात..! मी अगदी हल्लीच लग्नाच्या मांडवाखालून गेले असल्यामुळे थोडंफार निरीक्षण आणि बरचसं आत्मपरीक्षण केल्यानंतर माझ्या मनाच्या तिजोरीत साठलेले लग्न आणि त्याच्याशी संबंधित अनेक मजेदार किस्से आणि अनुभव तुमच्याशी या सदरात शेअर करणार आहे.


‘हाती मेंदी, डोळा पाणी;
उरी हुंदका, मनात गाणी’
मनाची अशीच काहीशी अवस्था मी अगदी काही दिवसांपूर्वीच अनुभवली. लग्नाला आत्ताच एक महिना पूर्ण झाला आहे, त्यामुळे अजूनही मी नववधू म्हणूनच सगळीकडे मिरवतेय. खरंतर, परीकथेतील ‘त्या’ राजकुमाराचं चित्र मनात पूर्ण होण्याआधीच माझं लग्न ठरलं. ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेला आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्या दिवसाला सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यांमध्ये माझं, खरंतर आम्हा सगळ्यांचंच आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. सहा महिन्यांपूर्वी एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी असलेले आम्ही दोघं, आमच्याही नकळत एकमेकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक बनलो. मला वाटतं हीच नियोजित (अरेंज्ड) लग्नांची गम्मत आहे.
आधी एक औपचारिक भेट, मग मेसेजेस, मग तासन्तास फोनवर मारलेल्या गप्पा, दर विकेंडला भेटण्याची ओढ, कधी जेवणाचा प्लान तर कधी सिनेमाचा, कधी नुसतंच समुद्रकिनारी बसून केलेलं स्वप्नरंजन.. खरं तर लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंतचा काळ या सगळ्यात खूप पटकन निघून जातो. पण दोघांचं नातं फुलण्यासाठी हाच काळ सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यावश्यक असतो. त्यामुळे साखरपुडा आणि लग्न यात किमान चार महिन्यांचं अंतर असावं असं मला तरी वाटतं.
लग्नाच्या या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ती ‘मुलगा पाहणं’ या पारंपरिक तरी अत्यंत मनोरंजक कार्यक्रमाने. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की लग्नासारखा, संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असलेला निर्णय असा अध्र्या तासाच्या भेटीत कसा घ्यायचा? पण माझ्या वेळी ती अध्र्या तासाची भेट आम्ही दोघंही बडबडे असल्यामुळे दोन तासांची झाली आणि आमचा निर्णय घरी पोहोचेपर्यंत जवळजवळ पक्का झाला होता. खरंतर आमच्या घरच्यांनी पारंपरिक कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला बगल देत आधी आम्ही दोघांनीच भेटावं असं ठरवलं. त्यामुळेच आम्हाला एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलता आलं, स्वभावांचा अंदाज आला, विचार कळले आणि आमची पहिल्याच भेटीत चक्क मैत्री झाली. त्यामुळे माझा मुलगा बघण्याचा आणि त्याचा मुलगी बघण्याचा, इतरांना सहसा बोअिरग वाटणारा, कार्यक्रम आमच्यासाठी इंटरेस्टिंग झाला होता.
एरवी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात त्या बिचा-या मुला-मुलीला सोडून इतर गावगप्पाच अधिक होतात. इतक्यात कुणाला तरी कार्यक्रमाचा मूळ उद्देश आठवतो आणि मग ‘तुम्ही हवं तर प्रश्न विचारा एकमेकांना’ अशी मुभा दिली जाते पण एवढय़ा लोकांसमोर प्रश्न तरी काय विचारणार आणि उत्तरं तरी काय देणार! म्हणून मग काही न बोलता-विचारताच, केवळ दिसण्यावर आणि घरातल्या इतर व्यक्तींकडे पाहूनच एकमेकांना होकार किंवा नकार कळवण्याची वेळ येते आणि मग लग्नाचा जुगार खेळला जातो. म्हणजे जर जोडीदार चांगला निघाला तर डाव आपला नाहीतर सगळीच गणितं चुकतात आणि लग्नाच्या नावावर केवळ तडजोड म्हणून एका छप्पराखाली दोन व्यक्ती वर्षानुवर्ष एकत्र राहतात.
बरं, योग्य जोडीदाराची निवड करताना काही ठरावीक ठोकताळे, नियम वगरे नसतातच. बुद्धी अनेक गोष्टी पडताळत असते; पत्रिका, नोकरी, घर, घरातली माणसं, मित्र, व्यसनं असं बरंच काही, पण मन एक कौल देत असतं आणि ज्यांना तो कौल नीट ऐकता आला त्यांची निवड सहसा चुकत नाही.
एकदा लग्न ठरल्यावर मात्र अनेक गोष्टींचा मनात कल्लोळ सुरू होतो. प्रत्येक गोष्ट करत असताना लग्नानंतर आपल्याला आधी आपण करत असलेल्या गोष्टी करायला मिळतील का, असे विचार मनात येत राहतात. मैत्रिणींसोबत फिरताना, शॉिपग करताना, सिनेमा बघताना, ऑफिसला जाताना, अगदी मोठय़ा आवाजात हसतानाही. त्यात लग्न ठरल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलेला असतो. एकीकडे आपल्यासाठी सगळे खूप आनंदी असल्याचं सांगून शुभेच्छा देत असतात आणि दुसरीकडे आधीच गोंधळून गेलेल्या मुलीला आणखी अस्वस्थ करण्याचा चंग बांधल्यासारखे वागतात. आपण कुठल्याही गोष्टीचा आनंद घेत असलो की, ‘करून घे मजा, आता लग्न व्हायचंय ना’ किंवा लग्न ठरल्यानंतर येणा-या प्रत्येक सणाला ‘हा तुझा शेवटचा सण’ असं काहीतरी विचित्र बोलत राहतात. माझं लग्न आहे की मी तुरुंगात शिक्षा भोगायला चालले आहे हेच मला अशा लोकांच्या बोलण्यावरून लक्षात येत नव्हतं.
त्यात आपल्याकडे ‘सासू’ या नात्याला उगीचच एक काळी, खलनायकी छटा देण्याची पद्धत आहे. लग्न ठरल्यापासूनच माझ्या ‘अनुभवी’ मैत्रिणी, बहिणी, शेजार-पाजारच्या, ऑफिसमधल्या बायका अशा समस्त स्त्री-जातीच्या प्रतिनिधींनी स्वत:चे अनुभव माझ्याशी शेअर करण्याच्या नावावर खरंतर मला घाबरवण्याचाच खूप प्रयत्न आरंभला होता. जेवणापासून, कपडय़ांपर्यंत आणि टिकलीपासून अगदी रोजच्या प्रवासाच्या सवयीपर्यंत ‘कळेल. कळेलच’ अशी एकच प्रतिक्रिया नियमित ऐकायला मिळत होती. काहीवेळा मी ‘माझा नवरा असा नाहीये, माझी सासू अशी नाहीये’ असं सांगण्याचा प्रयत्न केला पण संसाराचे ‘अनुभवी’ बोल बोलत असलेल्या माझ्या प्रिय सख्या त्यावरही ‘सहा महिने थांब फक्त, त्यानंतर हेच बोलतेस का बघूच’ असं मलाच आव्हान देऊ लागल्या. मग या लग्न-संसाराच्या खेळात अजून लिंबू-टिंबू असलेली मी, त्यांच्याशी हुज्जत घालणं सोडून हे सल्ले एन्जॉय करायला सुरुवात केली.
या दरम्यान मला खूप विचित्र प्रश्नही पडू लागले होते. म्हणजे मुलगी फक्त लग्नाच्या दिवशी ‘नवरी’ आणि दुस-या दिवशीपासून ‘बायको’ बनते पण मुलगा मात्र आयुष्यभर नवराच राहतो, असं का? आणि गम्मत म्हणजे यावरही मला ‘कळेलच.. कळेलच’ असंच उत्तर मिळत होतं.
असो, कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता नवीन घरात जायचं असं माझं आधीच ठरलं होतं. मी संसार वैगरे याबद्दल बोलण्यासाठी अजून तशी नवीनच आहे पण माती मऊ असतानाच तिला योग्य आकार दिला तर उत्तम कलाकृती घडते. त्यामुळे नव्या घरातले सुरुवातीचे हे शिकण्याचे आणि समजून घेण्याचे दिवस, थोडक्यात माझ्या ‘ट्रेनिंग पिरीयड’ची मी सध्या तरी खूप मजा घेतेय.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण मुली जसं आपलं घर, कुटुंब सोडून नवीन घरी राहायला जात असतो तसंच ते घरही एका नवीन माणसाला घरात, कुटुंबात सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतं. आपल्या आणि त्या कुटुंबाच्या अनेक वर्षाच्या सवयी, दैनंदिन आयुष्य या सगळ्यावरच त्याचा परिणाम होत असतो. घरी एखादा पाहुणा आला तरी त्याच्यासाठी काही दिवस जागा करताना आपल्या नाकी नऊ येतात आणि इथे तर कायमसाठी एका व्यक्तीला आपल्या घरात आणि त्याहीपेक्षा आपल्या कुटुंबात सामावून घेणं हे तेवढं सोपं नक्कीच नाही. दोन्ही बाजूंनी थोडा प्रयत्न करणं हा त्यावरचा एकमेव उपाय आहे.
माझे सासू-सासरे आणि नवरा गेली अनेक वर्ष घरात तिघंच राहत होते पण आता मी आल्यानंतर त्यांनी मला असं काही आपलंसं करून घेतलं आहे की पाच दिवस माहेरपणाला गेल्यानंतरही माझं तिथे लक्ष लागत नव्हतं आणि त्यांनाही इथे माझ्याशिवाय करमत नव्हतं. शेवटी मी माहेरचा मुक्काम एक दिवस आधीच गुंडाळून परत माझ्या नवीन घरी आले. मला केवळ महिन्याभरातच हे घर माझं वाटू लागलंय याचं श्रेय खरं तर त्या घरातल्या माणसांचंच आहे. जसं माहेरी होतं अगदी तसंच मी या घरातल्या प्रत्येकाशी मोकळेपणाने बोलू शकते, अगदी सास-यांशीदेखील माझ्या बाबांसोबत बोलायचे तशा गप्पा मारू शकते. मला माझ्या घराची आठवण येऊ नये म्हणून माझा नवरा माझा मित्र झाला, सासू-सासरे आई-बाबा झाले आणि नणंदा मैत्रिणी झाल्या. माझ्या सवयी त्यांनी आत्मसात केल्या. आणि त्यामुळेच या घरात रुळायला मला एक आठवडाही लागला नाही.
अर्थात, या बाबतीत प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. पण माझ्या निरीक्षणाप्रमाणे अनेकदा ‘सासर’ याविषयीच्या चुकीच्या समजुतींमुळे आणि नव्या नवरीच्या पूर्वग्रहदूषित मनामुळेच अनेक वाद निर्माण होतात. ते थोडय़ाफार प्रमाणात असणारच पण अनेकदा ते टाळता येण्यासारखे असतात. सासर म्हणजे सासुरवास ही चुकीची समजूत आपल्या समाजातून हळूहळू नामशेष व्हायला हवी. लग्न ठरलेल्या मुलीला सासरची आणि तिथल्या माणसांची भीती दाखवण्यापेक्षा आपल्या चांगल्या अनुभवांतून तिचा आत्मविश्वास वाढवायला हवा. तरच ती साफ मानाने आणि सकारात्मक दृष्टिकोन सोबत घेऊन नव्या घरात प्रवेश करू शकते. लग्न दोन माणसांचं नाही तर दोन कुटुंबांचं असतं आणि असावं. दोन्ही पक्षातल्या लोकांनी एकमेकांच्या अडचणी समजून सगळं निभावून नेलं की सोहळाही छान होतो आणि मनंही दुखावली जात नाहीत. कारण लग्नात आहेराच्या साडय़ा किंवा रुखवताचं सामान महत्त्वाचं नसून एका नव्या नात्याची होणारी सुरुवात आणि त्यानिमित्तानं जोडली जाणारी दोन घरं आणि त्यातली माणसं सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात.
तृप्ती एकबोटे-देवरुखकर

Wednesday, 29 January 2014

प्राणिपालक होताना...

प्राणिपालक होताना...
प्राण्यांची आवड असणं आणि त्यांचा सांभाळ करता येणं या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत. योग्य माहितीअभावी आपण अनेकदा आपल्या पाळीव प्राण्यांचा जीव नकळत धोक्यात घालतो. प्राणिपालक होण्यासाठी अधिक जागरूकतेची आवश्यकता आहे.

काही दिवसांपूर्वी सोनालीला एक कुत्रा जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. तिने जवळ जाऊन त्याचा अंदाज घेतला असता गळ्यातल्या पट्टय़ावरून तो पाळीव कुत्रा असल्याचं तिला दिसलं. त्याच्या मालकाने त्याला सोडलं असावं किंवा तो भटकला असता त्याला एखाद्या वाहनाने धडक दिली असावी. त्याची अवस्था पाहता त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळणं आवश्यक होतं, पण अशा कोणत्याही संस्थेची माहिती त्यावेळी तिच्याजवळ उपलब्ध नव्हती. संपर्क शोधण्यासाठी तिने तीन-चार फोनही केले पण तोवर खूप उशीर झाला होता, तो कुत्रा गतप्राण झाला होता. दुस-या दिवशी सकाळी त्याच रस्त्याने जात असताना तिला त्याचं शव अद्याप तिथेच पडलेलं आणि त्यामुळे दरुगधी पसरल्याचं आढळलं. शेवटी तिनेच पालिकेला फोन लावला आणि त्यानंतर त्या मुक्या जनावराच्या शवाला तिथून उचलण्यात आलं. ही घटना पुढे अनेक दिवस तिच्या मनाला बोचत राहिली.
प्राण्यांचं हे असंच असतं. माणूस आणि पाळीव प्राणी किंवा पक्षी यांच्यातल्या सुंदर नात्याबद्दल अनेक कथा आपण पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. घरात पाळीव प्राणी किंवा पक्षी असणं अनेक ठिकाणी तर उच्च राहणीमानाचं प्रतीक मानलं जातं. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना आपलं आडनाव लावण्याचाही नवा पायंडा प्राणिपालकांमध्ये पडला आहे. काही सर्वेक्षण आणि अभ्यासांमधून असं सिद्ध झालं आहे की, पाळीव प्राणी घरात असलेले लोक अधिक सुदृढ असतात कारण हे प्राणी त्यांना तणावमुक्त राहण्यासाठी फायदेशीर ठरतात. पण प्राण्यांची नुसती आवड असणं पुरेसं नाही तर त्यांची योग्य कोळजीही घेता यायला हवी. नाहीतर वर सांगितलेल्या गोष्टीसारख्या दुर्दैवी घटना घडतात.
काही वेळा प्राण्यांसोबत इतरांचा जीवही नकळत धोक्यात येतो. मागे एकदा परेलमध्ये राहणा-या एका मुलाने हौसेखातर घरात चक्क अजगराचं पिल्लू आणलं. छोटय़ाशा बरणीत ठेवलेलं ते पिल्लू सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय बनलं. आणि एक दिवस अचानक ते बरणीतून गायब झालं. प्रचंड शोधाशोध करूनही ते काही हाती लागलं नाही. तेव्हा सगळ्यांचं कुतूहल काळजीमध्ये बदललं. त्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ते पिल्लू बिल्डिंगमधल्या अडगळीच्या सामानात असल्याचा सुगावा लागला आणि तिथल्या रहिवाशांनी सर्पमित्रांना पाचारण केलं. त्यांनी बरीच मेहनत करून त्याचा माग काढला आणि त्याला पकडण्यात यशस्वी झाले. जेव्हा त्याला पकडण्यात आलं तेव्हा ते पिल्लू राहिलं नसून चांगला सात-आठ फुटांचा अजगर झाला होता. तो जर वेळेत पकडला गेला नसता तर पुढे अनर्थ झाला असता. मुळात अजगर हा पाळीव प्राणीच नाहीए पण प्राणिप्रेमींच्या उत्साहाला अंत नसतो. परंतु त्यामुळे इतरांच्या जीवावरही बेतू शकतं.
शहराच्या ठिकाणी साधारणपणे कु त्रा, मांजर, ससे, सफेद उंदीर, पोपट, लव्हबर्ड्स आणि मासे वगैरे पाळले जातात तर ग्रामीण भागात गाय, म्हैस, बैल, शेळय़ा पाळण्याचं प्रमाण मोठं आहे. त्यांचा व्यावसायिक उपयोगही केला जातो पण तिथल्या लोकोंना त्यांच्या संगोपनाबद्दल पारंपरिक माहिती असते. इथे शहरात मात्र निव्वळ हौसेखातर, मित्रांनी आणला म्हणून किंवा रस्त्यात बिच्चारं पिल्लू पडलं होतं आणि दया आली म्हणून घरी आणलं असं करणा-यांचं प्रमाण अधिक आहे. पण आपण खरंच त्या प्राण्याची योग्य कोळजी घेऊ शकतो को, त्याच्या संगोपनासाठी आवश्यक असलेलं वातावरण निर्माण क रू शकतो को, याचा विचार फोर थोडी माणसं करतात. मग त्यांना सांभाळणं कठीण झालं की सोनालीला रस्त्यावर दिसलेल्या त्या कुत्र्यासारखी परिस्थिती उद्भवते. अगदी घरात फिशटँक बनवतानाही त्यात आपण कोणते मासे ठेवतोय, त्यांना योग्य अन्न दिलं जातंय का, त्यातल्या एखाद्या माशाचा इतर माशांना त्रास होणार नाही, टँक नेहमी स्वच्छ राहील.. अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते पण याबद्दल आपल्याकडे खूप उदासीनता दिसते. टँक स्वच्छ करण्याचा आळस केला जातो आणि माशांचे हाल होतात.
अनेकदा आपल्याकडे योग्य ती माहिती नसते. आपल्याकडे असलेल्या प्राण्यांची किंवा पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची, रस्त्यात एखादा प्राणी जखमी अवस्थेत सापडला तर काय करायचं किंवा आपल्या आसपास एखाद्या प्राण्यावर अत्याचार होताना दिसले तर कुणाला संपर्क साधायचा हे आपल्याला कळत नाही. एकाच ठिकाणी ही सगळी माहिती उपलब्ध व्हावी या हेतूने ‘पेट्स आर पीपल टू’ नावाचं संकेतस्थळ एका प्राणिपालकाने सुरू केलं आहे. इश्मित चंडोक या प्राणिप्रेमीची कथाही फार रंजक आहे. एका बांधकाम परिसरात इश्मितला कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू सापडलं. तो त्याला घरी घेऊन आला आणि खूप प्रेमाने त्याचं नाव ‘हार्ली चंडोक’ असं ठेवलं पण प्राणिपालनाबाबत त्याला कोहीच माहीत नव्हती. काही दिवसांनी हार्ली कुत्र्यांसाठीचं अन्न खाईनासा झाला. तेव्हा व्यवसायाने शेफ असलेल्या इश्मितने भरपूर अभ्यास करून त्याच्यासाठी पौष्टिक अशा पाककृती तयार केल्या आणि पुढे हाच त्याचा व्यवसायही झाला. ‘हार्लीज कॉर्नर’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या कुत्र्यांसाठीच्या घरगुती अन्नाला आज मुंबईत बरीच मागणी आहे. आणि हे सारं के वळ त्याच्या आयुष्यात आलेल्या एका कुत्र्यामुळे शक्य झालं, असं तो नम्रपणे मान्यही करतो. याच प्राणिप्रेमीने इतर प्राणी मित्रांची मदत करण्यासाठी आणि पाळीव प्राण्यांच्या संगोपनाबाबत जाती निर्माण व्हावी यासाठी ‘पेट्स आर पीपल टू’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. इथे मुंबई, पुणे आणि बंगळूरुमधल्या प्राण्यांच्या डॉक्टर्सची, अॅम्ब्युलन्स सेवा, इस्पितळे आणि संस्थांची माहिती दिलेली आहे.
त्याचबरोबर पाळीव प्राण्यांच्या संगोपनाविषयीची तसंच त्यांच्याशी संबंधित कायदेशीर बाबींचीही माहिती उपलब्ध आहे. डॉ. मकरंद चौसाळकर हे प्राणितज्ज्ञही इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असतात.
पाळीव प्राण्यांसंदर्भात अशा माहितींचे आणखी स्रोत निर्माण होण्याची आवश्यकता आहे. तरच आपल्याकडे प्राण्यांसंबंधी असलेल्या उदासीनतेला आळा बसेल तसंच सर्कस, प्राणिसंग्रहालय, सिनेमा अशा कोणत्याही ठिकाणी त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, याची आपल्याला जाणीव होईल.
तृप्ती एकबोटे-देवरुखकर

Thursday, 23 January 2014

संशोधनातून सक्षमतेच्या वाटेवर

संशोधनातून सक्षमतेच्या वाटेवर

स्त्रियांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि सक्षमीकरणासाठी झटणा-या अनेक संस्था आहेत; पण समाजातील त्यांच्या स्थानाबाबत अभ्यास करून त्यांच्या सबळीकरणासाठी प्रयत्न करणारी ‘सोफाया सेंटर फॉर विमेन्स स्टडीज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ ही सोफाया कॉलेजची संस्था आणि तिचं कार्य प्रेरणादायी आहे.
स्त्रियांचे प्रश्न आणि त्यांचं सक्षमीकरण याबद्दल आजकाल कुणीही बोलताना दिसतो. यासाठी काम करणा-या संस्थांचा तर सुळसुळाट झाला आहे. अशा खूप कमी संस्था अस्तित्वात आहेत, ज्या वेगळा विचार करून समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्यासाठी पर्याय पुढे आणतात.
मुंबईतल्या सोफाया महाविद्यालयाने प्रस्थापित केलेली ‘सोफाया सेंटर फॉर विमेन्स स्टडीज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ ही एक अशीच संस्था आहे, जी समाजात स्त्रियांना भेडसावणा-या समस्यांचा संपूर्ण अभ्यास करते आणि या माहितीच्या आधारावर महिला सक्षमीकरणासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करते. सोफाया महाविद्यालयाच्या आवारातच या संस्थेचं एक सुसज्ज ग्रंथसंग्रहालय आहे, ज्यात स्त्रियांशी निगडित अनेक विषयांवर विविध भाषांमध्ये देशातील आणि विदेशातीलही साहित्य उपलब्ध आहे.
त्याचप्रमाणे वृत्तपत्रांमधील स्त्रियांविषयी छापून आलेल्या लेख आणि बातम्यांचे सर्व तपशील छापील स्वरूपात उपलब्ध आहेत. शिवाय इंटरनेटची सुविधाही आहे. थोडक्यात, स्त्रियांविषयी अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी हे सुसज्ज ‘रिसर्च सेंटर’ तयार करण्यात आलं आहे. वर्षाअखेर या संशोधनाचा अहवाल छापला जातो, ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या अभ्यासांसाठी होतो. दरवर्षी संस्थेमार्फत ‘उर्ध्वमूल:’ हे स्त्रिया आणि त्यांच्याशी संबंधित विषयांवर पुस्तक प्रकाशित केलं जातं.
सुरुवातीला १९९०-९१ साली सोफाया कॉलेजच्या तत्कालीन प्राचार्यानी संस्थेची संकल्पना पुढे आणली. अखेर, ६ ऑक्टोबर २००१ रोजी या संस्थेची स्थापना झाली. या महाविद्यालयाच्या सध्याच्या प्राचार्या डॉ. (सिस्टर) आनंदा अमृतमहल या संस्थेच्या संचालकपदी अत्यंत उत्साहाने आणि जबाबदारीने सूत्र सांभाळत आहेत. त्यांच्या मते, ‘‘या संस्थेची स्थापना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच त्यांच्या समस्या समजून घेऊन, त्यांच्यातील गुणांची ओळख करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी झालेली आहे. ही संस्था लहान असली तरी या कार्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे.’’
या संस्थेच्या कार्यक्रम अधिकारी असलेल्या लता पुजारी आणि पल्लवी बांदोडकर यांनी संस्थेच्या उद्दिष्टांबद्दल माहिती देताना सांगितलं की, आम्हाला अधिकाधिक ग्रामीण भागात पोहोचून तिथल्या स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी काम करायचं आहे. त्यांच्यापर्यंत केवळ वस्तू पोहोचवण्यापेक्षाही त्यांच्यातला विश्वास जागृत करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. केवळ स्त्रियांना मार्गदर्शन करून उपयोग नाही, तर परुषांनाही योग्यरीत्या जागृत करणं आवश्यक आहे. म्हणूनच संस्थेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि प्रशिक्षणांमध्ये पुरुषांनाही सहभागी केलं जातं.
आकांक्षा, मुंबई मदर्स अ‍ॅण्ड चिल्ड्रन ऑर्गनायझेशन, यंगस्टर्स अशा विविध संस्थांसोबत सोफाया सेंटरने पुण्याजवळील राजगुरूनगर, कर्नाळा, वसई-विरार अशा अनेक भागांमध्ये काम केलं आहे. स्त्रियांची निर्णयक्षमता वाढावी आणि त्यांनी आत्मविश्वासानं स्वावलंबी व्हावं याकरिता ही संस्था अनेक छोटय़ा-मोठय़ा गृहव्यवसाय आणि लघुव्यवसायांचं प्रशिक्षणही पुरवते.
या अंतर्गत चॉकलेट-आईस्क्रीम बनवणं, बेकरी, मेणबत्त्या, कागदापासून शोभेच्या वस्तू बनवणं इथपासून थेट इंग्रजी भाषेचं शिक्षण, घरातील यंत्रांची दुरुस्ती करणं, खाद्यपदार्थ आणि पोषण, आत्मरक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य सहाय्यक, सामाजिक कार्य अशा अनेक विषयांचं शिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणानंतर अनेक महिलांनी स्वत:चे उद्योगही सुरू केले आहेत. संस्थेतर्फे अनेक स्तरांवर महिलांच्या विविध प्रश्नांवर वाद-विवाद आणि परिसंवादांचं आयोजनही केलं जातं.
सोफाया सेंटरद्वारे अनेक सव्‍‌र्हे आणि माहितीची पडताळणी करून स्त्री अर्भकाची वजन-उंची, स्त्रियांशी संबंधित पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना अशा विषयांवर मानवी हक्क आयोगाकडे प्रबंध सादर करण्यात येत आहे. महिला सक्षमीकरणासाठी अशाप्रकारची संस्था स्थापन करून सोफाया कॉलेजने एक नवा पायंडा पाडला आहे. या संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी महाविद्यालय स्वत: विशिष्ट रक्कम वर्षागणिक खर्च करते. पण बरेचदा निधीअभावी अनेक कामं लांबणीवर पडतात. शासनाकडून या संस्थेला आणि त्यांच्या संशोधन कार्याला कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. सुरुवातीच्या काळात टाटा, एस्सार अशा काही कंपन्यांकडून निधी उपलब्ध होत असे, पण आता मात्र संशोधनाच्या कामासाठी खर्च करण्यास कंपन्या निरुत्साही दिसत आहेत.
स्त्रियांना समाजात असमानतेची वागणूक मिळण्यामागची, ती दुर्लक्षित राहण्यामागची मूळ कारणं शोधून त्यावर उपाय करण्याचा ‘सोफाया सेंटर फॉर विमेन्स स्टडीज अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’चा निर्धार आहे. आम्ही समस्या सोडवू असा आमचा दावा नाही, पण त्या समस्येचा खोलवर संपूर्ण अभ्यास करून ती सोडवण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असं संस्थेचे अधिकारी ठामपणे सांगतात. महिला सक्षमीकरणाबद्दल वरवरची चर्चा आणि कृती करणा-या आपल्या समाजात प्रामाणिकपणे या समस्यांचा अभ्यास करून तोडगा काढणा-या अशा संस्थांची गरज आहे.
संपर्क : sophia_womencentre@rediffmail.com

नोकरी करणारीच मुलगी हवी!


स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याबद्दल कुणीही भरभरून बोलताना दिसतं पण आपल्याकडच्या ‘सोयीनुसार’ उदयास आलेल्या स्त्री स्वातंत्र्याच्या संकल्पना आता पुन्हा एकदा अभ्यासण्याची गरज आहे. नोकरी करणारी मुलगी ही काळाची गरज आहे, पण तिच्या नोकरीशी जोडलेल्या इतर अनेक गोष्टींचा विचार करण्याची आपण तसदीही घेत नाही.

आजकाल कुठल्याही विवाहोत्सुक तरुणाला किंवा त्याच्या आई-वडिलांना तुम्हाला लग्नासाठी कशी मुलगी हवी असा प्रश्न विचारला की, ‘कशीही असो पण नोकरी करणारी हवी’, असं उत्तर हमखास मिळतं. कोही जणांची तर निव्वळ तेवढीच अट असते. (आपण रूढ आणि सौम्य भाषेत याला ‘अपेक्षा’ असं म्हणतो) अनेक दा तर रंग, रूप, गुण, वर्तणूक, संस्कार अशा अनेक गोष्टींना फोटा दिला जातो आणि केवळ नोकरी या एकाच ‘गुणाला’ प्राधान्य दिलं जातं. चांगली नोकरी असणा-या मुलींना लग्नाच्या ‘बाजारात’ जास्त मागणी असते. आमची सून फलाना फलाना कंपनीत एवढया मोठया पगाराच्या नोकरीवर आहे, हे सांगताना आजकाल सासरकडच्या मंडळींचा ऊर अभिमानाने (की गर्वाने) भरून येत असतो. एकवेळ अशी होती जेव्हा लग्नानंतर नोकरी करण्याची परवानगी मिळावी, मुभा मिळावी म्हणून मुलींना खूप प्रयत्न करावे लागत. पण आपल्या समाजाने लग्नानंतर मुलीने नोकरी करण्याची ‘मुभा’ ते ‘अट’ हा प्रवास कधी साध्य केला ते कळलंच नाही.
मुलीने आत्मनिर्भर असावं, आर्थिकदृष्टया स्वतंत्र असावं, हे शंभर टक्के वादातीत आहे पण म्हणून तिने कुठल्याही परिस्थितीत नोकरी करत राहण्याचं बंधन जाचकच आहे. कोरण घरातल्या कमावत्या पुरुषाकडून त्याने गृहव्यवस्थापनही करावं अशी कुणाचीही अपेक्षा नसते पण बाईकडून मात्र तिने नोकरी करावी, वेळेत घरी यावं, जेवणही करावं, मुलांनाही सांभाळावं, नव-याकडे- सासूसास-यांकडेही बघावं, पाहुणेमंडळींपासून सा-यांची उठबसही करावी, सण-वारही करावेत, घरकामही करावं.. अशा सगळ्याच अपेक्षा अगदी सहजपणे केल्या जातात. पण नव-याप्रमाणेच ती सुद्धा आठ-नऊ तास नोकरी क रून, बस-ट्रेनचे धक्के खात, अनेक व्याधी अंगावर कोढत, उन्हा-पावसात राबतच असते. ती ही माणूसच आहे, ती ही दमते. पण घरची परिस्थिती उत्तम असतानाही तिने नोकरी करतंच राहायला हवी, कोरण अनेकदा तिची नोकरी हा घरच्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रकार मध्यम वर्गीय आणि उच्चमध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक आढळतो. कोरण आजच्या वाढत्या महागाईत गरीब घरांमध्ये शक्य असेल तितक्यांनी नोकरी करणं अनिवार्यच झालेलं आहे. खरं तर मध्यम वर्गातही ही बाब लागू होते पण त्यांच्याकडे अनेकदा पर्याय उपलब्ध असतात.
परवा नवव्या महिन्याच्या गर्भवतीला ट्रेनमधून प्रवास करून नोकरीसाठी जाताना पाहिलं आणि न राहवून विचारलं तेव्हा, ‘पर्याय नाहीए गं! ऑफिसमधून पगारी रजा मिळत नव्हती आणि पहिल्या बाळंतपणाचा सगळा खर्च माहेरच्यांनी करायचा आहे, त्यांना थोडा हातभार लागावा म्हणून जमेल तितके दिवस नोकरी करतेय.’, असं ती म्हणाली. बाळ आपल्याला हवं पण त्याच्या जन्मासाठी खर्च उचलणं म्हणजे ‘आपल्यात अशीच पद्धत आहे’ हे बिरूद ऐकवलं जातं. याचाच अर्थ आपल्या ‘सफेद कॉलर’ समाजात आजही इतक्या भंपक आणि तर्कहीन गोष्टींचा प्रथेच्या नावाखाली आपण बिनदिक्कत अवलंब करतच असतो. असो, हा संप्रू्ण स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
आपल्या मूळ मुद्दयाकडे परतताना माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीसोबत नुकताच घडलेला एक किस्सा आठवतो. तिचं लग्न झालं, तेव्हा तिला मोठया कंपनीत उत्तम पगाराची नोक री होती. दुर्दैवाने लग्नानंतर तीनच महिन्यांनी तिला ही नोकरी सोडावी लागली. दुसरी नोकरी शोधून ती मिळेपर्यंत चार-सहा महिन्यांचा कोलावधी गेला. पण ह्या कालावधीत लग्नाच्या वेळी तिला डोक्यावर घेणा-या सासरच्या मंडळींची वागणूक सरडयाच्या रंगाप्रमाणे बदलली. ‘आम्हाला कोयमस्वरूपी नोकरी असणारी दुसरी मुलगी मिळत होती, उगीच घाई केली, तुला नोकरी मिळाली की मी तुझ्याशी पूर्वीसारखी चांगली वागेन’, असे कडवट बोल आडून-आडून ऐकवायला सुरुवात झाली. त्या नवविवाहित तरुणीच्या मनावर ह्याचा काय परिणाम झाला असेल, ह्याचा विचारही करवत नाही. पण हे जर आपल्या पुरोगामी म्हणवणा-या समाजातील प्रातिनिधिक चित्र असेल तर समस्या गंभीर आहे.
मुळात नोकरीची अट असण्यामागची कोरणं कोय, असं लग्नाच्या ‘बाजारात’ उभ्या असलेल्या कोही मुलांना विचारलं असता, कोहींनी साळसूदपणाचा आव आणत, ‘ती तिच्या पायावर उभी राहायला हवी, तिचं व्यक्तिस्वातंत्र्य..’ वगैरे गोष्टींचा ऊहापोह केला तर कोहींनी थोडं मोकळं होत ‘माझ्या कमाईला हात-भार लागावा म्हणून..’, अशी प्रांजळ कबुली दिली.
कोहींनी तर ‘घरी बसून नुसत्या मालिका पाहणं आणि चहाडया करणं.. यापेक्षा घराबाहेर गुंतलेली असणं बरं म्हणून नोकरी करावी’ असं सांगितलं. पण तिच्या ह्या ‘गुंतवणुकी’तून आलेला पैसा गुंतवण्याचे किंवा खर्च करण्याचे अधिकारही अनेकदा तिच्याकडे नसतात. तिच्या आत्मनिर्भरतेच्या नावावर अनेकदा तिच्या कमाईवरच डोळा असल्याचं दिसून येतं. म्हणून तर पगार झाला की तो सुनेने सासूच्या किंवा नव-याच्या हातात आणून ठेवावा असा आजही अनेकांचा आग्रह असतो ज्याला आपण ‘आधुनिक संस्कारां’च्या यादीत सुलभतेने नेऊन ठेवतो.

आपली बदलती जीवनशैली आणि वाढती महागाई पाहता घरात अधिक कमाईची गरज प्रत्येकाला जाणवते आहे. नवरा-बायको दोघंही कमावते असले तरी निभावणं कठीण होत चाललंय, अशा वेळी आपल्या जुन्या समजुती बाजूला ठेवून आपण आपल्याकडच्या स्त्रियांना शिकवलं, नोकरी करण्याची परवानगी दिली पण तिला तिचे छंद जोपासण्याची, सहका-यांसोबत पार्टी किंवा सहलीला जाण्याची मुभा दिली को? तिला वाटेल तेव्हा माहेरी किंवा बाहेर जाण्याची सूट आपण तिला दिली को? तिच्या नोकरी आणि क रिअर संबंधीचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तिला खरंच आहे को? म्हणजे स्वातंत्र्य दिल्याचं दाखवायचं पण नाडया मात्र आपल्याच हातात राहतील, याची सोयीने कोळजीही घ्यायची, असा दुटप्पी व्यवहार होताना दिसतो. एका दिवसासाठी को होईना तिला स्वयंपाकघरातून रजा देणारे असे कितीसे नवरे आपल्याला आजूबाजूला दिसतात. समाजातल्या स्त्री-स्वातंत्र्याच्या संकल्पना पुन्हा एकदा पडताळून पाहण्याची आपल्या समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. पण दुर्दैवाने जिथे तिला एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आपला समाज असमर्थ ठरला आहे, तिथे तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा एवढा विचार कोण आणि कशासाठी करेल?
तृप्ती एकबोटे-देवरुखकर

मराठीतले चेतन भगत कुठे आहेत?

मराठीतले चेतन भगत कुठे आहेत?

रस्त्याच्या कडेला असलेल्या पुस्तकविक्रेत्याकडील ढिगा-यात एखादं गाजणारं नवं मराठी पुस्तक सापडलंय? एखाद्या महाविद्यालयाच्या आवारात नव्या मराठी पुस्तकावर किंवा लेखकावर जोरदार चर्चा किंवा वाद झडताना बघितलाय? पटकन दहा तरुण मराठी लेखकांची नावं सांगा, असं म्हटल्यावर कुणाची नावं आठवतात?

नुकतीच एका कार्यक्रमात दुर्जोय दत्ता नामक तरुण लेखकाशी ओळख झाली. वयाच्या केवळ २६व्या वर्षी तब्बल आठ सर्वाधिक खपाच्या (बेस्ट सेलर) इंग्रजी पुस्तकांचा लेखक म्हणून तो नावारूपाला आलाय आणि त्याचं नववं पुस्तक हाँगकाँग पर्यटन मंत्रालयाने त्याला त्यांच्या देशात आमंत्रित करून लिहून घेतलं आहे. अनेक नामवंत व्यासपीठांवर त्याला ‘यंग अचिव्हर’ म्हणून सन्मान मिळाला आहे. स्वत: तरुणांचा प्रतिनिधी असलेल्या दुर्जोयने विशेषत: महाविद्यालयीन वयोगटातल्या मुला-मुलींना आवडतील अशा नावांची आणि तशाच विषयांची पुस्तकं लिहिली, काहीशी घाबरतच वाचकांसमोर आणली आणि आज त्याचा स्वत:चा वाचकवर्ग निर्माण झाला आहे.
दुर्जोयशी झालेली चर्चा मनात ताजी असतानाच चर्चगेट स्टेशनबाहेर रस्त्यावरील विक्रेत्यांकडची पुस्तकं मला नेहमीप्रमाणे खुणावत होती. रंगीबेरंगी मुखपृष्ठांच्या आकर्षक नावांच्या ढिगाने ठेवलेल्या पुस्तकांच्या खजिन्यात अनेक इंग्रजी नवलेखकांची पुस्तकं दिसत होती. पण एखाद्या नवीन मराठी लेखकाचं पुस्तक मला दिसत नव्हतं. तशी पानिपत, ययाति, संभाजी अशी मराठीतली काही गाजलेली पुस्तकं तिथे एका कोप-यात ठेवलेली दिसत होती. पण माझी नजर शोधत होती, एखाद्या तरुण मराठी लेखकाच्या पुस्तकाला!
या अनुषंगाने मनात अनेक प्रश्न उमटले. मराठी तरुण लेखक काही लिहितात की नाहीत आणि ते लिहीत असतील तर वाचकांपर्यंत कितपत पोहोचतंय. फेसबुक आणि ब्लॉग्जवरच्या पोस्ट्स म्हणजेच तरुणांचं मराठीत ‘साहित्य’ आहे का? वाचकांची धडाकेबाज पसंती मिळावी, असं काही त्यांच्याकडून लिहूनच होत नाही का? एकामागोमाग हिट पुस्तकं लिहू शकतील, असे (इंग्रजीसारखे) तरुण लेखक मराठीत का नाहीत?
मराठीत लिखाणच होत नाही, असा मुद्दा नाहीये, तर मराठीत तरुणांसाठी तरुणांनी लिहिलेलं लिखाण करण्याची इच्छाशक्तीच दिसून येत नाही. लेखकांपेक्षा कवींचाच सुळसुळाट अधिक दिसतो आणि जे काही गद्यलेखन होतं ते वाचकांपर्यंत पोहोचतच नाही, अशी परिस्थिती आहे. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी असल्यामुळे प्रत्येक वेळी ‘मराठीत लिहिणार कोण आणि वाचणार कोण’, असा प्रश्न करणा-यांनी, इंग्रजीत लिहिणारी तरी किती मराठी मुलं आहेत हेही तपासून पाहायला हवं. कितीशा इंग्रजी पुस्तकांवर मराठी लेखकांची नावं झळकताना दिसतात? किती मराठी पुस्तकांचे इतर भाषांमध्ये अनुवाद होतात? याउलट मराठीमध्ये इतर भाषांतून अनुवादित केलेल्या पुस्तकांच्या राशी दिसतात.
याबाबत मराठी चित्रपटांचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवायला हरकत नाही. काही वर्षापूर्वी मराठी तरुणांनी मराठी सिनेमाकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. पण अनेक नवीन प्रयोग झाल्याने तरुण पुन्हा मराठी सिनेमाकडे वळले. मराठी साहित्यसृष्टीनेही तरुणांना मराठीत लिहिण्यासाठी असंच प्रेरित करण्याची आवश्यकता आहे. पण आपल्याकडे अनेकदा तरुणांच्या लेखनाला नावं ठेवण्याचेच प्रकार अधिक दिसतात. खरं तर मराठी तरुणांकडे प्रतिभेचा अभाव मुळीच नाही, पण आपण वेळोवेळी फेसबुकच्या भिंतीवर जे काही खरडतो तेच मराठी लेखनाचं भवितव्य आहे, असा त्यांचा गैरसमज झालेला दिसतो. त्यातूनही कुणी जिद्दीने पुस्तक लिहिलंच तरी ते प्रकाशित करण्यासाठी मोठया दिव्यातून जावं लागतं. ‘वाफाळलेले दिवस’ या खूप वेगळ्या विषयावरच्या पुस्तकाचे तरुण लेखक प्रतीक पुरी याविषयी सांगतात, ‘पुस्तकाचं लिखाण झालं तरी ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशक आणि वितरक अशा दोन महत्त्वाच्या टप्प्यांमधून जावं लागतं. आपल्याकडे नेमका हाच दुवा कमकुवत आहे. पुस्तक छापून घेण्यासाठी बरेचदा प्रकाशकांशी ओळख किंवा त्यांच्याकडे वशिला असावा लागतो. तसंच लेखकाने स्वत:च्या खिशात हात घालावा, अशीही अपेक्षा असते. त्यामुळे अनेकदा नवोदित लेखकांसाठी संभ्रमाची स्थिती निर्माण होते. प्रत्येक वेळी लेखक स्वत: खर्च करण्याच्या परिस्थितीत असेलच असं नाही, त्यामुळे अनेकदा पुस्तक प्रकाशित करण्यापासून तरुण लेखक परावृत्त होतात. नवीन प्रकाशकासोबत काम करायचं तर त्याचं वितरण कमकुवत असतं. आर्थिक कमकुवतपणा आणि जाहिरात किंवा पुस्तकाच्या प्रसिद्धीचा अभाव हे नवीन मराठी लेखक तयारा न होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे.’
खरं तर, हे एक दुष्टचक्र आहे. लिहिलेलं वाचकांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे त्याबद्दल जागृतीच निर्माण होत नाही. अर्थात, त्यामुळे मागणी नसते आणि मागणी नाही म्हणून लिखाण खुंटतं. म्हणजे लेखक कायम ‘चांगलं वाचणारेच नाहीयेत’ आणि वाचक कायम ‘चांगलं लिहिणारेच नाहीयेत’ अशी बोंबाबोंब करत राहतात.
इंग्रजी पुस्तकांसाठीची बाजारपेठ मोठी आहे, कारण इंग्रजी वाचणारे अधिक आहेत हे मान्य. पण मराठी पुस्तकं वाचायची इच्छा असलेली तरुण पिढीच अस्तित्वात नाही, हे सपशेल खोटं आहे. कारण ‘नटरंग’, ‘शाळा’, ‘दुनियादारी’, ७२ मैल’ असे मराठी सिनेमे यशस्वी झाले, तेव्हा हे सिनेमे ज्या कादंब-यांवर बेतलेले आहेत, त्या पुस्तकांची मागणी अचानक वाढली आणि ती तरुण वर्गाकडून होताना दिसते. याचा अर्थ पुस्तकं वाचण्याची इच्छा तरुण मराठी मुलांनाही प्रचंड आहे, पण त्यांना पुस्तकांची माहिती आणि उपलब्धता नाही. कारण मराठी पुस्तकं प्रसिद्धी आणि वितरण या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मागे पडतायत.
अर्थात, काही जण एवढा नकारात्मक विचार न करता मराठी लेखक ‘टेक-सॅव्ही’ होऊ लागले आहेत. ते ब्लॉग्ज लिहितात, फेसबुक खरडतात हेही नसे थोडके, असा विचार करतात. पण हा टेक-सॅव्हीपणा म्हणजे एक प्रकारची बंडखोरी आहे. पूर्वी आपण लिहिलेलं छापून यावं, यासाठी जोडे झिजवणारा लेखक आज स्वत:चा मजकूर ब्लॉग्ज किंवा फेसबुकवर टाकून मोकळा होतो. पण लेखक आधुनिक झाला असला तरी वाचक तसा झाला आहे का? सरसकट सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन आणि टॅब आले आहेत का? ..आणि आले असले तरी त्यावर ई-बुक्स आणि ब्लॉग्ज वाचण्याला कितीसे लोक, विशेषत: कितीसे तरुण प्राधान्य देतात? हे ब्लॉग्ज आणि मोठया पोस्ट्स वाचणा-यांची संख्या अत्यंत नगण्य आहे. अगदीच तुलना करायची झाली तर फक्त मराठीतलाच लेखक तांत्रिकदृष्टया सक्षम झाला आहे का, असाही प्रश्न आहे.
याचा अर्थ इंग्रजी लेखक अजून मागासलेले आहेत, की त्यांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आजही पुस्तकं लिहावी लागतात, असा होतो, पण तसं नाही. बाजारात कितीही शीतपेयं आली तरी ती पाण्याची जागा घेऊ शकत नाहीत. तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी आपल्या आयुष्यातलं पुस्तकांचं महत्त्व कमी होऊ शकत नाही. किंबहुना छापील जगाकडून आधुनिक किंवा डिजिटल विश्वाकडे प्रवास करताना पुस्तकं मागे सोडायची की नाही, हा संपूर्णत: आपला निर्णय असणार आहे. ..आणि नावीन्य केवळ माध्यमांमध्येच नाही तर लिखाणातही यायला हवं, हे समजणं गरजेचं आहे. नाहीतर फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्ज अशी माध्यमं नवी, पण त्यावर टाकल्या जाणा-या मजकुराची भाषा इंटेलेक्च्युअल पठडीतली, तरुण वाचकांच्या डोक्यावरून जाणारी असली तर या आधुनिक माध्यमांचा काय उपयोग? दुर्जोयच्या मते, ‘प्रमाण आणि समजायला अवघड भाषेत लिहिलेलं म्हणजेच चांगलं लिखाण असं समजणं मूर्खपणाचं आहे. जे जास्तीत जास्त वाचकांच्या मनापर्यंत सहजतेने पोहोचतं, तेच खरं तर उत्तम लिखाण!’
लेखक आणि समीक्षक सतीश तांबे यासंदर्भात म्हणतात, ‘‘आपल्याकडे नव्याची आसच दिसत नाही. वेगळे आणि नवे प्रयोग उचलून धरले जात नाहीत. परंपरा आणि रूढींच्या नावाखाली जुनंच कुरवाळत बसण्याच्या आपल्या मानसिकतेमुळेच नवीन लिखाण फारसं दिसत नाही. मग चेतन भगतला तरुणांनी डोक्यावर घेतलं, तर पोटशूळ उठण्याचं कारणच नाही. कारण तो नवीन प्रयत्न तरी करतोय. दुर्दैवाने आज मराठीतला चेतन भगत कोण, असा प्रश्न विचारला तर एकही नाव समोर येत नाही. कारण आपल्याकडे प्रयोग स्वीकारलेच जात नाहीत. काळानुरूप भाषेत आणि लेखनशैलीत बदल व्हायलाच हवेत, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.’’
एक चांगला वाचक तयार होण्याची प्रक्रिया खरं तर वाचता येऊ लागण्यापासूनच सुरू होते. आधी लहान मुलांसाठीची, मग माहितीपर, प्रेरणात्मक पुस्तकं अशी ही प्रक्रिया पुढे जात राहते. पण काय वाचायचं, हे स्वत: ठरवण्याच्या वयात आलेल्या तरुणांमध्ये इंग्रजीतल्या प्रेमकथांव्यतिरिक्त आपल्या भाषेत बरंच काही वाचण्यासारखं आहे याची जाणीवच नसते. काही महिन्यांप्रू्वी ऐश्वर्य पाटकर या तरुण लेखकाला त्याच्या ‘भुईशास्त्र’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, पण आज कुठल्याही महाविद्यालयाच्या आवारात फेरी मारून या लेखकाबद्दल विचारलं तर किती मराठी तरुणांना हे नाव माहीत असेल, याबाबत शंकाच आहे.
‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ या स्वखर्चाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे तरुण लेखक अवधूत डोंगरे एकंदरीतच या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना म्हणतात, ‘‘आपल्या करोडो मराठी भाषिकांच्या प्रदेशात मराठी पुस्तकांची आवृत्ती केवळ हजार प्रतींची निघते, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचतच नाहीत, तर त्यातले प्रयोग विचारात घेणं आणि स्वीकारणं किंवा नाकारणं ही तर दूरची गोष्ट आहे. इंग्रजी पुस्तकांच्या प्रकाशकांकडे पाहायला मिळणारी व्यावसायिकता आपल्याकडे नावालाही मिळत नाही. आपल्याकडे प्रकाशनाचा वडिलोपार्जित व्यवसाय किराणा मालाच्या दुकानासारखा चालवला जातो. मराठी पुस्तकांच्या या परिस्थितीला केवळ प्रकाशक आणि वितरकच जबाबदार नाहीत, तर माध्यमं आणि वाचकांची आर्थिकदृष्टया संकुचित मनोवृत्तीही तेवढीच जबाबदार आहे.’’
आपल्याकडे फुकटात पुस्तकं मिळवून वाचण्याची वृत्ती इतकी खोलवर रुजलेली आहे, की विकत घेऊन पुस्तकं वाचणारे किंवा पाठपुरावा करून ती मिळवणारे, ऑनलाइन मागवणारे वाचक फार कमी दिसतात. कुठल्याही मराठी वृत्तपत्रात चित्रपटांप्रमाणे पुस्तकांसाठी वेगळ्या पुरवण्या दिसत नाहीत, पुस्तक परीक्षण कशा पद्धतीने होतं, हा तर निराळा चर्चेचा विषय आहे. आज एकाही मराठी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर पुस्तकांसाठी वेगळा विभाग दिसत नाही. याउलट पुन्हा एकदा तुलनाच करायची झाली, तर बहुतेक सगळ्याच इंग्रजी वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर पुस्तकांसाठी विशेष विभाग असल्याचं दिसतं. मराठी वृत्तवाहिन्या पुस्तकांवर चर्चा, नवीन पुस्तकांची माहिती देणारे, नवीन लेखकांना समोर आणणारे कार्यक्रम करताना दिसत नाहीत. खरं तर या माध्यमांचा प्रभावी वापर करून नवीन पुस्तकं आणि लेखकांबद्दल जागृती निर्माण करणं मराठी माध्यमांना सहज शक्य आहे.

मराठी लेखनाला आलेली मरगळ, हरवलेले लेखक आणि त्यांचं लिखाण, वाचकांची उदासीनता आणि माध्यमांचं दुर्लक्ष, अशा अनेक गोष्टींच्या वावटळीत अडकलेलं मराठी लेखनाचं विश्व लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक, माध्यमं अशा कडयांना मजबूत केल्याखेरीज चैतन्यशील होणार नाही. तरुण मराठी लेखक कुठे आहेत, याचं उत्तर शोधण्याची आता खरंच वेळ आली आहे.

Wednesday, 22 January 2014

अदभुत ओमान

अदभुत ओमान


त्याच त्या ठिकाणांना आणि देशांना भेट देण्याची इच्छा नसेल आणि किफायतशीर बजेटमध्ये नवीन स्थळी पर्यटनासाठी जाण्याचा तुमचा विचार असेल तर ओमान हा उत्तम पर्याय ठरू शकतो.



पर्यटनासाठी परदेशवारी म्हणजे अमेरिका, युरोपियन देश किंवा फार तर ऑस्ट्रेलिया असं आपल्याकडचं पक्क समीकरण. शॉपिंगसाठी पर्यटन करायचं तर दुबई आहेच. त्यामुळे आखाती देशांमध्ये जाण्याचा विचार झालाच तरी दुबईच्या पुढे काही आपलं विमान सरकत नाही. पण आता दुबईच्या आसपासचे इतर देशही बाह्या सरसावून पर्यटन व्यवसायात उतरले आहेत आणि त्यांना विशेष ओढ आहे ती भारतीय पर्यटकांची. या देशांच्या यादीत सर्वात पुढे आहे ‘ओमान’. दुबईपासूनच नाही तर मुंबईपासूनही अतिशय जवळच्या अंतरावर असलेला हा अरेबियन देश अगदी दोन-तीन वर्षापूर्वीपर्यंत पर्यटकांसाठी ‘सिक्रेट डेस्टिनेशन’ होता. परंतु २०१०नंतर ओमान टुरिझमने भारतात मोठया प्रमाणावर ओमानचा प्रचार सुरू केला.
परिणामी तिथल्या पर्यटकांमध्ये आता भारतीयांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येतेय. खरं तर ओमानच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ ६० टक्के लोक भारतीय असून ते नोकरीच्या निमित्ताने तिथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे भारतातून ओमानचा प्रवास करणा-यांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी जाणारे आणि त्यांना भेटायला जाणारे, यांचंच प्रमाण आजवर अधिक होतं, पण आता ओमान पर्यटनाच्या दृष्टीनेही सज्ज झालं आहे. नुकतंच ओमान पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने ‘बालाजी टेलिफिल्म्सच्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ ह्या हिंदी सिनेमाचं चित्रीकरण ओमानमध्ये पार पडलं. या सिनेमातील ओमानमध्ये चित्रित केलेली दृश्यं भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा फायदा होईल, असं ओमान पर्यटन मंत्रालयाला वाटत आहे. आणखी काही भारतीय चित्रपट निर्मात्यांसोबत अशा प्रकारचे करार करण्यासाठी ते उत्सुक आहेत.
भारतीय विशेषत: मुंबईतील पर्यटकांसाठी ओमानचा प्रवास निव्वळ दोन तासांचा आणि थेट आहे. त्यामुळे कुठेही विमान बदलून, थांबून प्रवास करावा लागत नाही आणि खर्चही वाचतो. तिकिटांचे दरही देशांतर्गत विमानांच्या तिकीटदरांहून केवळ दोन-तीन हजार रुपये एवढेच अधिक आहेत.
ओमानमध्ये निसर्गदत्त सौंदर्य लाभलेली आणि मानवी कलात्मकतेचा आविष्कार असलेली बरीच प्रेक्षणीय स्थळं आहेत. मुळात बाहेर फिरण्याची आवड असलेल्यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. म्हणजेच इथे मॉल्स, म्युझियम्स अशी बंदिस्त ठिकाणं पाहण्यापेक्षा इथले सुंदर समुद्रकिनारे, पर्वतरांगा, मधाळ रंगांची वाळवंटं, भव्य आणि नेटके राजवाडे अशा जागा फिरण्यात जास्त मजा आहे. ओमानची राजधानी असलेलं मस्कत हे शहर जितकं सर्वसमावेशक आहे, तितकीच इथली छोटी-छोटी ठिकाणं आपला इतिहास आणि आपल्या इस्लामी सभ्यता आणि परंपरांच्या घट्ट पायावर उभी राहिलेली दिसतात. इथल्या राजवाडयांच्या भिंती आणि अतिभव्य मशिदींच्या अंतर्गत रचनेतील कलाकुसर इथल्या लोकांच्या सौंदर्यप्रियतेची आणि शालीनतेची प्रतीकं आहेत. इथल्या ‘सुलतान काबूस’च्या भव्य मशिदीत एकाच वेळी २० हजार जण प्रार्थना करू शकतात. या मशिदीचं वैशिष्टय असलेला जगातला सर्वात मोठा ७० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद, १७०० गाठी असलेला पर्शियन गालिचा तब्बल २१ टनांचा असून, सहाशे बायकांनी चार वर्ष विणून तो तयार केला आहे. जुन्या मस्कतमधला सुलतानचा राजवाडा, ‘अल-जलाली’ आणि ‘अल-मिरानी’ हे किल्ले ओमानच्या श्रीमंतीचे वारसदार भासतात. ‘ओमानी हेरिटेज गॅलरी’ आणि ‘बेट मुझना गॅलरी’मध्ये खास ओमानी वस्तू पाहता आणि विकत घेता येतात. या वस्तू थोडया महाग असतात, पण ओमानी हस्तकला संग्रही ठेवण्याची हीच एकमेव संधी असते. सुगंधाची आवड असणा-यांसाठी तर ‘एमॉग’ या जगप्रसिद्ध आणि महागडया अत्तराच्या कारखान्याला भेट देणं ही पर्वणी ठरते. इथला धूपही विशेष प्रसिद्ध आहे.
इतिहासाची आवड असलेल्यांनी ‘अल-हमरा’ या ४०० वर्ष जुन्या गावाला नक्की भेट द्यायला हवी. इथल्या सर्वोच्च ‘जबल शाम्स’ या पर्वतावरून जगातल्या सर्वात मोठया गुहांपैकी एक असलेल्या ‘अल-हूटा’ या गुहेला भेट देता येते. ‘अल-जलाली’ आणि ‘अल-मिरानी’सोबतच ‘बहाला’, ‘फिकाईन’, ‘मुत्राह’, ‘नखल’, ‘निजवा’, ‘सोहर’ आणि ‘रूस्ताक’ असे किल्ले ओमानमधील अप्रतिम पुरातन स्थापत्यशास्त्र आणि अभियांत्रिकी कौशल्यांचे आरसे आहेत. निसर्गाच्या जवळ जाण्याची आवड असणा-यांना इथली समुद्रसृष्टी खूप जवळून अनुभवता येते. त्याचप्रमाणे इथल्या वाळवंटांत आणि कडेकपा-यांमध्ये साहसी खेळांचा थरारही अनुभवता येतो.
इथलं निसर्गसौंदर्य, लोकांच्या वागण्यातली अदब, आपलेपणा आणि अवतीभवती भरपूर भारतीय माणसांचा वावर, यामुळे आपण आपसूकच या देशाशी जोडले जातो. राहण्याची उत्तम सोय करण्याची जबाबदारी अनेक पंचतारांकित प्रसिद्ध हॉटेल्सनी उचलली असली तरी थंडगार रात्री मनमोहक वाळवंटात तंबू ठोकून निरभ्र आकाशातल्या चांदण्या न्याहाळणं हा संपूर्ण ओमान भेटीचा उच्चतम क्षण ठरतो.
सभ्यता आणि शालीनतेचा देश असलेल्या ओमानमध्ये फिरताना आपण मात्र अतिउत्साहात तिथल्या वास्तूंचा आणि लोकांचा अपमान करणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. कुटुंबासोबतओमान यात्रा उत्तम पर्याय आहे, पण हनिमूनर्ससाठी नाही. इथल्या स्थानिक सभ्यतेनुसार स्त्री-पुरुषांनी उघड उघड लगट करण्यास मनाई आहे. स्त्रियांनी बाहेर फिरताना एखादी शाल किंवा स्कार्फ सोबत ठेवावा, कारण तिथल्या मशिदी आणि इतर पवित्र वास्तूंमध्ये प्रवेश करताना स्त्रियांनी डोके झाकण्याची पद्धत आहे. तसंच पुरुषांनीही पूर्ण लांबीची विजार घातलेली उत्तम.
मद्यपान इथे वज्र्य मानलं जात असलं तरी काही ठरावीक उपाहारगृहांमध्ये अधिकृतरीत्या मद्यविक्री केली जाते. पण मद्यपानापेक्षा तिथलं चवीने थोडं कडवट असलेलं ‘कावा’ हे आपल्या चहासारखं पेय, ‘लोखेमत’ या गोडसर पदार्थासोबत चाखण्यात वेगळीच मजा आहे. सणासुदीच्या वेळी ‘शुवाह’ हा आणखी अनोखा पदार्थ चाखायला मिळतो. हा बनवण्यासाठी मटणाचे तुकडे, मसाले आणि इतर जिन्नस टाकून ते जवळजवळ दोन दिवस जमिनीखाली मातीच्या भांडयात शिजवले जातात.
सार्वजनिक स्वच्छतागृहांची शहरात आणि शहराबाहेर तशी अजूनही फारशी उपलब्धता नाही, त्यामुळे बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान प्रचंड वाढून कधीतरी पन्नासपेक्षा अधिक अंश सेल्सिअसपर्यंतही पोहोचतं. पण सप्टेंबर ते एप्रिल हा ओमानला भेट देण्यासाठी उत्तम आणि योग्य कालावधी समजला जातो.

ओमानमधला आगळावेगळा निसर्ग आणि एका वेगळ्या संस्कृतीचा अनुभव ही सहल आल्हाददायक बनवतो यात शंकाच नाही. तर यंदा ओमानच्या अदबशीर पाहुणचाराचा आनंद अनुभवण्यासाठी थोडी वेगळी वाट निवडायला हरकत नाही.

तृप्ती एकबोटे-देवरुखकर